
नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकार्यांना समन्स पाठवले आहे. केंद्र सरकारच्या ३ अधिकार्यांनी या १३ अधिकार्यांना समन्स पाठवल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक , पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकार्यांना हे समन्स देण्यात आले आहे. मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकार्यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौर्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला. या दोन तासांच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला. कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला होता.




