अखेर ६ तासांनंतर व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक पूर्ववत; कंपनीचा माफीनामा

मुंबई : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. तब्बल ६ तास सोशल मीडिया सर्वर तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलं होतं. त्यामुळे युजर्स चिंतेत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप का बंद पडलं त्याबाबत अद्याप कुठलंही कारण समोर आलं नाही. काही लोकांनी यामागे सायबर हल्ला असल्याची शक्यता वर्तवली आहे. भारतासह जगभरात सहा तासाहून अधिक काळ ही सेवा बंद होती. आता तात्पुरत्या स्वरुपात पुन्हा सेवा सुरू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतीय वेळेनुसार, मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. काही जणांच्या मते या सर्वरचं डीएनएस खराब झाल्याने सेवा बंद झाल्याचं बोललं जात आहे. डीएनएस हा इंटरनेटचा कणा मानला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर अथवा कॉम्प्युटरवर वेबसाईट ओपन करता तेव्हा डीएनएस तुमच्या ब्राऊजरला कुठल्याही वेबसाईटचा आयपी काय आहे हे सांगतो. प्रत्येक वेबसाईटचा एक आयपी असतो. ट्विटर, फेसबुक प्रकरणात डीएनएस तुमच्या ब्राऊजरला ट्विटर, फेसबुकचा आयपी काय आहे ते सांगतो. अशावेळी फेसबुक, ट्विटरचा रेकॉर्ड असलेला डीएनएस डेटाबेसमधून काढून टाकला जातो. तेव्हा तुम्ही फेसबुक, ट्विटर अॅक्सेस करू शकत नाही.
सोमवारी रात्री जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप अचानक डाऊन झालं होतं. रात्री ९.१५ च्या आसपास तिन्ही सर्वर डाऊन झाल्याने युजर्सला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. जवळपास सहा तासांनी युजर्सला ही सेवा पुन्हा वापरता येत आहे. पहाटे ४ च्या सुमारास फेसबुकनं या सेवा पुन्हा बहाल केल्याचं ट्विट केले. त्याचसोबत युजर्सची गैरसोय झाली त्याबद्दल कंपनीनं माफी मागितली आहे. आउटेजच्या या समस्येमुळे लोकांना कुणालाही मेसेज पाठवता येत नव्हता किंवा कुणाचाही मेसेज पोहचत नव्हता.
व्हॉट्सअॅपच्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, हळूहळू सेवा पूर्ववत होत असून आम्ही पूर्ण सतर्कतेने या दिशेला जात आहोत. इतका वेळ युजर्सला व्हॉट्सअॅप वापरता आलं नाही त्याबद्दल क्षमा मागतो. सर्वर डाऊन झाल्याबद्दल जी काही कारणं समोर येतील ते तुमच्यापर्यंत पोहचवली जातील. काही लोकांकडून आम्हाला ही सेवा काम करत नसल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आम्ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं सांगण्यात आले आहे.