एरव्ही विरोधकांना घाम फोडणाऱ्या फडणवीसांची उडाली घाबरगुंडी !

पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ओळखले जातात. त्यांच्या आक्रमक आणि अभ्यासपूर्ण वृत्तीने ते अनेकदा विधानसभेत विरोधकांना धारेवर धरतात. मात्र हेच आक्रमक, निर्भिड फडणवीस जेव्हा घाबरतात तेव्हा अनेकांंना हसू आवरेना. राज्याच्या राजकारणात कोणालाच घाबरत नाही. असं म्हणणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला घाबरतात, अशी कबुली दस्तुरखुद्द फडणवीसांनीच दिली.
पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं. तेंव्हा फडणवीसांनी स्मशानभूमीच्या उदघाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते, असं म्हणताना त्याचं कारण ही त्यांनी सांगून टाकलं. फडणवीस म्हणाले, मी नागपूरचा महापौर असताना, तेव्हाच्या विरोधीपक्ष नेत्यांच्या वॉर्डात गेलो होतो. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला. असं म्हणताच एकच हशा पिकला. पण सुदैवाने तुम्ही तसं काही केलं नाही. हे माझं नशीब म्हणायचं, असंही ते म्हणाले.
राज्याच्या राजकारणात एक फायरब्रँड नेता अशी ओळख असलेले फडणवीस, आक्रमकतेने विरोधाकांवर तुटून पडणारे फडणवीस, विधान भवनातल्या आक्रमक भाषणाने अनेकांना घाम फोडणारे फडणवीस जेव्हा घाबरत असल्याची कबुली देतात, तेव्हा कार्यकर्त्यांनाही हसू आवरेना झालं. कोण किती का आक्रमक, निर्भिड असेना स्मशानभूमिची सर्वांनाच भिती वाटते, हे फडणवीसांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. याची थेट कबुलीही त्यांनी दिली आहे.