राजकारण

राष्ट्रवादीसाठी ईडी, पाऊस ‘लकी’च : सुप्रिया सुळे

चंद्रपूर : कोणी कितीही आरोप केले आणि कितीही चौकशी लावली तरीही काहीही फरक पडणार नाही. खोटे आरोप केल्याने खूप प्रसिद्धी मिळते, यामध्ये विरोधकांना आनंद वाटतो. ईडी आणि पाऊस या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी लकीच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत राहू. आमच्यावर टीका केल्यामुळे जर कुणी मोठे होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. ट्रकभर पुरावे कुठे गेले, हे महाराष्ट्राने बघितले आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी त्या चंद्रपुरात आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. मागील काही दिवसांमध्ये अनेकांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लावण्यात आला आहे. त्यातही पवार कुटुंबीयावर अधिक लक्ष दिले जात आहे. ईडी किंवा इतर चौकशींना आम्ही घाबरत नाही. कोणीही कितीही चौकशी करू द्या, सत्य बाहेर येईल, असेही त्या म्हणाल्या.

ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तरीही ओबीसी नेत्यांनी आपल्याला आणखी मार्गदर्शन करावे, सर्वांनी मिळून प्रयत्न करून ओबीसींचा प्रश्न मार्गी लावू, असेही त्यांनी सांगितले. राज्यात महाआघाडी सरकार चांगले काम करीत आहे. लसीकरणामध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच कामात नाही तर प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला समोर न्यायचे असल्याचे त्या म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आताही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, कोणाला काय वाटते, हे माहीत नाही. मात्र, मी खासदार आहे आणि मला खासदारच असल्यासारखे वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button