
जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलताना, मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती’, असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची गरिमा काय असते, याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे, याचे त्यांना भान नसेल, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे, वेळ पडली तर त्यांना शॉक सुद्धा दिले पाहिजे, असं गुलाबराव म्हणाले.
नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख हेसुद्धा प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले भूत येथे आलं आहे. मला तर वाटते यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय. यांना भानुमतीच्या भक्ताकडे नेलं पाहिजे आणि यांच्या अंगात काय घुसलंय पाहायला पाहिजे, असंही गुलाबराव म्हणाले.
नारायण राणे यांनी वक्तव्याबाबत माफी मागण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करुन गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांची माफी मागण्याचीही लायकी राणे यांची नाही, बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा, कामाच्या बाबतीत टीका जरुर करावी, सरकारच्या अपयशाबद्दल भूमिका मांडावी, पण काय बोलावं, हे शिकवायचं असेल, तर नारायण राणेंची मला कीव येते, असं गुलाबराव म्हणाले.




