
ठाणे : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटनाच्यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीतून सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कालच (गुरुवारी) नवी मुंबईत देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन केलं. त्यामध्ये देखील केंद्राचा मोठा सहभाग आहे. मी मराठीत बोलतोय, कारण नरेंद्र मोदी यांना मराठी चांगलं समजतं, असं उद्धव ठाकरे म्हणताच नरेंद्र मोदींनाही हसू आल्याचं दिसून आलं.
मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरुन सुरुवातीला ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गीकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गीकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गीका असतील. या दोन्ही मार्गीकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गीकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना 36 अधिकच्या लोकल फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील ३४ फेऱ्या वातानुकूलित असतील आणि दोन फेऱ्या सध्या लोकलच्या असतील.
जितेंद्र आव्हाड-श्रीकांत शिंदे संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर
ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिल्यानंतर खासदार श्रीकांत शिदे यांनी त्यांना थांबवलं आणि थेट उठून बोलायला सुरुवात केली.
ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मार्गिकेचे उद्घाटन केलं. पण त्या आधी जितेंद्र आव्हाड बोलायला उभे राहिल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी त्यांना अचानक थांबवलं आणि आपण बोलायला सुरुवात केली. श्रीकांत शिंदे म्हणाले की, गेली १४ वर्षे हा प्रकल्प रखडला होता. माझ्या मतदार संघात हा प्रकल्प येतो, आता मात्र तो पूर्ण झाला, त्यासाठी मी रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करतो, रेल्वे मंत्र्यांचे आभार व्यक्त करतो. अजून मोठे प्रकल्प माझ्या मतदारसंघात सुरू आहेत. कळवा ऐरोली एलिव्हटेड प्रकल्प लवकर सुरू करावा अशी मागणी करतो.
खारेगाव उड्डाणपुलावरूनही आमने-सामने
ठाण्यात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले होते. या पुलाच्या श्रेयवादावरुन बोलताना तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला असा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला होता. राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनीही आपणच निधी आणल्याचा दावा केला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत यांच्यात अनेक कार्यक्रमात शाब्दिक जुगलबंदी बघायला मिळते.
श्रीकांत शिंदेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुण आहे, खूप मेहनत घेतोय. त्याच्यावर एखादी जबाबदारी दिली की तो ती पार पाडतोच. अंबरनाथमध्ये एक प्राचिन मंदिर होतं. मी त्याला म्हणालो की, श्रीकांत काहीतरी कर तिकडे. तर त्याने या मंदिराच्या परिसरात खूप चांगलं काम केलं. आता त्या ठिकाणी जाणं म्हणजे पवित्र वाटतंय.