मुंबईतील ८ दिवसांची परिस्थिती बघून लोकलबाबत निर्णय : वडेट्टीवार
लोणावळ्यात ओबीसी नेत्यांचे २६-२७ जून रोजी शिबिर

पुणे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, मुंबईत अजूनही लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. पुढील ८ दिवसांत परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच, ओबीसी नेत्यांचे लोणावळ्यात २६ जून रोजी शिबिर आयोजित केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुण्यात ओबीसी आरक्षणाबाबत बैठक पार पडली. नुकतंच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसीचं अतिरिक्त आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. राज्यातील ओबीसी नेते, मंत्री विजय वडेट्टीवार, बाळासाहेब सानप व इतर नेते बैठकीला उपस्थित होते. ओबीसी समाजाची जनगणना केली जावी अशी मुख्य मागणी आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर आधीची संख्या आणि आताची संख्या यात फरक जाणवून लागला आहे. निर्बंध शिथिल करताच संख्या वाढू लागली आहे. शनिवारची संख्या आणि डिस्चार्ज यात फरक आला आहे. त्यामुळे आठ दिवसांची परिस्थिती बघून मुंबईत लोकल सुरू करायची की नाही याबद्दल निर्णय घेऊ, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची घोषणा केली आहे. २६ आणि २७ जून रोजी लोणावळा इथं २ दिवसीय ओबीसी नेत्यांचं शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २५० जण या शिबिराला हजर राहणार आहेत. पक्षीय अभिनिवेश सोडून नेते सहभागी होणार आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत कामाची दिशा ठरवणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कमी होण्याची विविध कारणे आहे. २०११ साली ओबीसी समाजाची जातनिहाय गणना झाली मात्र तो डेटा उपलब्ध केला नाही. काँग्रेससह सर्वच पक्षांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही.मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली. कुणाच्या विरोधात लढणार नाही, डेटा कसा उपलब्ध करून घ्यायचा हे ठरवणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.




