देशात कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर! २४ तासात ३ लाख ३२ हजारांहून अधिक नवे रूग्ण

नवी दिल्ली : कोरोनाची देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३२ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात करण्यात आली तर २ हजार २६३ जणांचा कोरोनाने बळी गेला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्या विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना स्थिती अगदी गंभीर आहेत. देशात ३ लाख ३२ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळल्याने ही संख्या वाढून १ कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ इतका झाला आहे तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ लाख ८६ हजारांवर पोहोचली आहे.
देशात बाधितांची वाढणारी ही आकडेवारी अक्षरश: धडकी भरवणारी आहे. तर दिलासादायक म्हणजे देशात गेल्या २४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशांत आतापर्यंत १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात २४ लाख २८ हजार ६१६ जणांवर कोरोनावरील उपचार सुरू असून ते सक्रिय रूग्ण आहे. तर देशात आतापर्यंत १३ कोटी ५४ लाख ७८ हजार ४२० जणांनी लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात २४ तासांत ६७ हजार रुग्णवाढ
दरम्यान गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख ९४ हजार ८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात ६ लाख ९९ हजार ८५८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.




