भाजपने ‘एक डाव भुताचा’ टाकला तर महागात पडेल; आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपालांनी १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याच्या आरोपावर आशिष शेलार यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? स्वतःचं राजकारण सुरु आहे, अशी टीका शेलारांनी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भाषा वापरली जात आहे? रोज १२, १२ ची टिमकी काय लावली आहे? तुमचे १२ वाजले आहेत काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शेलारांनी केली. भुताने जर फाईल पळवली असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, भाजप तर काही करत नाही, पण भाजपने एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला भारी पडेल हे सुद्धा संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.




