गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारचे नियम जाहीर

मुंबई : गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
गढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.




