उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध : बावनकुळे

नागपूर: काँग्रेस नेते नसीम खान यांनी उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी मोठं विधान केलं आहे. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय स्टंट केला जात आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय आखाडा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहे.
मुंबईसह ठाणे महापालिकेच्या निवडणुका डोळ्सासमोर ठेवून काँग्रेसने उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मताच्या राजकारणासाठीची ही मागणी करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून काँग्रेसने कधीच अशी मागणी केली नव्हती. मग आताच ही मागणी का करण्यात आली? हा निवडणुकीचा स्टंट आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
केंद्र सरकारने राज्याला आरक्षणाचे अधिकार दिले आहेत. आता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. आधीच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. एकीकडे जे आरक्षण होतं ते संपत चाललंय. दुसरीकडे मतांसाठी ही मागणी केली जात आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेला सल्ला अंमलात आणावा. दोन्ही बैठकीत फडणवीस यांनी जे मुद्दे मांडले त्याची सरकार अंमलबजावणी का करत नाही?, असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारवर ओबीसी समाजाचा विश्वास नाही. यांच्या मनात ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं नाही. डिसेंबरपर्यंत हे चालढकल करणार. मग ओबीसींच्या जागेवर सुभेदार आणि पैसेवाले आणून डल्ला मारणार. हे कट कारस्थान, असा आरोप त्यांनी केला.
वडेट्टीवारांच्या भूमिकेवर संशय नाही
विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर माझा संशय नाही. पण या सरकारमधील एक मोठा गट ओबीसी आरक्षणाला विरोध करतोय. सरकारने ओबीसी समाजासोबत बदमाशी केली कर आमचा ओबीसी समाज यांना रस्त्यावर येऊ देणार नाही. मुख्य सचिव सारखे बैठकीच्या तारखा बदलत आहेत. त्यांचावर दबाव आहे, असा दावा करतानाच तीन महिन्यात इम्पेरिकल डाटा गोळा करावा, डिसेंबरमध्ये आरक्षण टाकावं, नाही तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.




