दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान

मुंबई : दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही, राज्य सरकारही परिक्षांच्या बाबतीत गोंधळलेली आहे. आधी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मग ऐनवेळी परिक्षा रद्द केल्या. त्यातही दहावी बोर्डाच्या परिक्षा रद्द केल्या मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार असं जाहीर केलंय. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंतर्गत गुणांवर ठरवणार आहेत. तर मग हे सारं करताना दहावीच्या परिक्षा रद्द करून सरकारनं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा काय परिणाम होईल याचा विचार हा निर्णय घेताना केलेलाच नाही असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.
त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देऊन या परिक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी यातनं करण्यात आली आहे. पुण्यातील नागरीक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं पुढील आठवड्यांत दुस-या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.



