शिक्षण

दहावीचा निकाल १५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यावर्षी दहावीची परीक्षा रद्द झाली होती. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणदानाबाबत फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. त्यानंतर आता एसएससी अर्थात दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल १५ जुलै २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या दिवशी दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार? याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकतात. सीबीएसईच्या दहावी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील दहावी आणि १२च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

महाराष्ट्र एसएससी परीक्षेचा निर्णय हा नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारावर दहावीचा निकाल जाहीर होईल. त्यासाठी नववीचे ५० टक्के गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे ३० टक्के गुण आणि दहावीतील प्रकल्प आदींचे २० टक्के गुण मिळवून निकाल तयार केले जातील. दरम्यान,विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने ११वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर १४ दिवसांनंतर राज्यात सीईटी परीक्षेचे आयोजन होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button