समीर वानखेडे यांना केंद्राची ‘झेड प्लस सुरक्षा’

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राज्याचे कॅबिनेटमंत्री नवाब मलिकांना यांनी थेट जाहीर सभेतून समीर वानखेडे लवकरच तुरुंगात जातील, असे म्हटले. त्यानंतर, वानखेडे आणि मलिक यांच्यातील शाब्दीक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच, वानखेडे कुटुंबातील सदस्यांनी आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले होते. तर, समीर वानखेडे यांच्या जीवाला धोका असल्याचेही सांगण्यात येत. त्यामुळे, केंद्रीय गृहमंत्रालयाने समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
समीर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर २ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे.