राजकारण

सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांची सीबीआय चौकशी करा : फडणवीस

मुंबई : सचिन वाझेंच्या पत्राची चौकशी होत दुध का दुध पानी का पाणी झाले पाहिजे. जे काही पत्र समोर येत असतील किंवा जबाब नोंदवले जात असतील तरी याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आले पाहिजे. कारण सत्य जोपर्यंत लवकर बाहेर येत नाही तोपर्यंत डागळलेली प्रतिमा कधीच ठीक होऊ शकणार नाही. न्यायालयाने सचिन वाझे प्रकरणात सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यात सचिन वाझेंच्या पत्रासह सगळ्या प्रकरणाची चौकशीही सीबीआयने किंवा त्याप्रमाणे सक्षम यंत्रणेने करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सचिन वाझेंचे पत्र अत्यंत गंभीर आहे. वाझेंच्या पत्रातील माहिती सर्वांना विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गोष्टी किंवा बाहेर येणाऱ्या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी चांगल्या नाहीत, सांगत फडणवीसांनी सचिन वाझे पत्रावरून आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यानंतर लसीकरणाच्या फडणवीस म्हणाले की, सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण मागील वर्षीही काही लोक रेस्मडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत होते आणि आताही ही परिस्थिती पाहयला मिळतेय. मुळात कोरोनाची दुसरी लाट सगळ्या राज्यांमध्ये नसून काही राज्यांमध्ये आहे. मागील लाट सर्व राज्यांमध्ये होती. परंतु आता आपल्या राज्याने ज्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नाही त्या राज्यांमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा घेता येईल का? यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून पुरवठा मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे. परंतु यामध्येही कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही यावकडे लक्ष देत काळाबाजार करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई सरकारने केली पाहिजे.

लसीकरणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, मी काल यासंदर्भात सगळे सांगितले त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे पत्र आपल्या सगळ्यांकडे पोहचले आहे. महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरून राजकारण बंद केले पाहिजे. लोकांच्या जीवशी खेळणे बंद केले पाहिजे. काल केंद्रीय आरोग्य मंत्र्य़ांनी स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्राला किती वॅक्सीन दिल्या? किती वॅक्सीन शिल्लक आहेत? किती अजून दिल्य़ा हे देखील सांगितले. त्यामुळे यासंदर्भात जे टीका करतात त्यांनी हे बघितले पाहिजे की महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्य़ा असलेल्या उत्तरप्रदेशपेक्षाही अधिक वॅक्सीन महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्याआधी सर्व क्षेत्रातील प्रमुखांशी चर्चा करायला हवी होती. यामधून सर्व क्षेत्राला कशाप्रकारे दिलासा देता येईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कशा कठोर उपाययोजना करून मार्ग शोधायला हवा होता. मात्र दोन दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन सांगत सातही दिवसांचा कडक लॉकडाऊन करत एकप्रकारे फसवल्याची भावना व्यापाऱ्यांप्रमाणे सर्वांमध्ये निर्माण झाली. व्यक्तीचे जीवन महत्त्वाचे आहे मात्र जीवन जगण्याकरिता त्याकडे दोन पैसे राहिले नाही, खायला प्यायला राहिले नाही तर कसे जगायचे या समस्येमुळे एकप्रकारे उद्रेक तयार झाला. सरकारने या उद्रेकावर लक्ष दिले पाहिजे. कारण सरकार आणि समाज एकमेकांसमोर उभे राहणे योग्य नाही. समन्वय कसा धडवता येईल आणि कधी दोन पाऊले मागे जायला पाहिजे कधी दोन पाऊले समोर यायला पाहिजे तर कुठे समजूतीचे वातावरण तयार करायला पाहिजे असे होताना दिसत नाही, असा खोचक सल्लाही फडणवीसांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button