भाजपसाठी पोटनिवडणूक हा सट्टा : अशोक चव्हाण

नांदेड: पंढरपूरची लॉटरी भाजपला एकदा लागली. वारंवार ती लागणार नाही. आम्हाला काम करणाऱ्याला ताकद द्यायची आहे. भाजपसाठी पोटनिवडणूक सट्टा आहे, नांदेड जिल्हा हा सट्टाबाजार नाही. नांदेड जिल्हा हा विकासाच्या वाटेवर चालणारा, शंकरराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याच्या विचारातून देगलूर बिलोलीची जनता जितेश अंतापूरकर यांना विजयी करेल यात शंका नाही, अशा विश्वास काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपनं शिवसेनेतील नाराज असलेले सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्तानं मतदासंघातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार!
पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं. pic.twitter.com/37UWkHqw2w— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 5, 2021
यावेळी चव्हाण म्हणाले की, काल भाजपची सभा देगलूर झाली, भाजपनं पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार, असं म्हटलं. दोस्तहो लॉटरी किती वेळा लागते, एकदाच लागते. जीवनात पुन्हा लॉटरी लावल्यास पैसे जात राहतात.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. त्यासाठी काँग्रेसने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. तर याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे देखील रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या पोट निवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाके फुटायला सुरुवात झालीय.