
नाशिक : विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं स्पष्टीकरण नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलं आहे.
नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं, असंही दीपक पांडे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.