
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही.
उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंदेखील लक्ष घातलं आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली लढवण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या संघाच्या बैठकीत झाला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशसोबत निवडणूक होत असलेल्या इतर राज्यांमध्येही भाजप मोदींचा चेहरा वापरला जाणार नाही.
प्रादेशिक नेत्यांच्या विरोधात पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे केल्यानं त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचं संघाला वाटतं. राज्याच्या निवडणुकीत प्रादेशिक नेते वि. मोदी असं चित्र उभं केल्यानं विरोधकांकडून मोदींना विनाकारण लक्ष्य केलं जातं असं निरीक्षण बैठकीत नोंदवण्यात आलं. दिल्लीत पार पडलेल्या संघाच्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सुत्रांच्या माहितीनुसार, संघाला मोदींच्या प्रतिमेची काळजी आहे. त्यामुळेच राज्यांच्या निवडणुका मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या जाऊ नयेत असं संघाला वाटतं.
संघाच्या बैठकीत पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाबद्दल चिंतन करण्यात आलं. बंगालमध्ये पंतप्रधान मोदी वि. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अशी रणनीती आखल्यानं नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव तर झालाच, त्यासोबतच विरोधकांना पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ले करण्याची संधी मिळाली. त्याचा मोठा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर झाला असं संघाला वाटतं. पश्चिम बंगालच नव्हे, तर याआधी बिहार आणि दिल्लीतही भाजपनं मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या. २०१५ मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याविरोधात आणि दिल्ली विधानसभेत अरविंद केजरीवालांविरोधात भाजपनं मोदींचा चेहरा वापरला. मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपला नुकसान सोसावं लागलं.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसनं मोदींची मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार केली. त्यामुळे मुस्लिमांची एकगठ्ठा मतं तृणमूल काँग्रेसला मिळाली. ७० टक्क्यांहून अधिक मुस्लिमांनी तृणमूलला मतदान केलं, अशी माहिती संघाकडे आहे. बंगालप्रमाणेच उत्तर प्रदेशातही मुस्लिमांचं प्रमाण लक्षणीय आहे. विधानसभेच्या ७५ जागांवर मुस्लिम मतदार थेट परिणाम करू शकतात. उत्तर प्रदेशात भाजपनं मोदींचा चेहरा वापरल्यास काँग्रेस आणि समाजवादी पक्ष बंगालमधील राजकारणाची पुनरावृत्ती करतील, असा धोका संघाला वाटतो.




