
सिंधुदुर्ग : भाजप आ. नितेश राणे यांना दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. राकेश परब यांनाही ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
नितेश राणेंना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयानं याआधीची जामीन अर्ज देणं फेटाळलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले होते. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आता आमदार निलेश राणे यांची कसून चौकशी केली जाणार आहे. आता नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते जामीनासाठी अर्ज करु शकतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्यामागे नितेश राणेंचा हात असल्याचा गंभीर आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष असलेल्या सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक असल्याचं समोर आलं होतं.
नितेश राणेंवर आरोप करण्यात आल्यानंतर अनेक दिवस नितेश राणे हे अज्ञातवासात होते. आधी जिल्हा सत्र न्यायालयाननं, त्यानंतर हायकोर्टानं आणि मग सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीनाबाबत दिलासा दिलेला नव्हता. अखेर आता न्यायालयानं नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली असून आता नितेश राणेंना अटक होणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. चारवेळा नितेश राणेंचा जामीन फेटाळण्यात आला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांनी नितेश राणेंचा शोध सुरू केल्यानंतर नितेश राणे सर्वात आधी अज्ञातवासात गेले आणि कणकवली न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली, मात्र तिथे त्यांना पहिला दणाका बसला आणि त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी तातडीने हायकोर्टात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांना दुसरा दणका बसला आणि हायकोर्टानेही त्यांचा जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांना दिलासा दिलाच नाही. काल सत्र न्यायालयातही त्यांची निराशा झाली.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण नितेश राणेंनी उच्च न्यायालयातील अर्ज मागे घेतल्याची माहिती वकील सतीश माने-शिंदे यांनी दिली. त्यानंतर नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयात शरण गेले आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना बाजू मांडण्यास बोलावले. त्यानंतर साधारण तीन तास त्यांच्या प्रकरणावर सुनावणी चालल्यानंतर कोर्टाने त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. राणेंना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात येत होती, तर पोलिसांनी नितेश राणेंची पोलीस कोठडी मागितली होती. कोर्टाने पोलिसांची आणि सरकारी वकिलांची ही मागणी मान्य करत राणेंना मोठा झटका दिला आहे आणि नितेश राणेंची रवानगी कोठडीत केली आहे.




