ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला शंभर टक्के अडकवले; साक्षीदार विजय पगारे यांचा दावा

मुंबई/शिरपूर : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आलं आहे. या प्रकरणात मोठी डील झाली होती. मात्र, नंतर ही डील फसली होती, असा दावा या प्रकरणातील एक साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीने थेट शिरपूरमध्ये जाऊन या प्रकरणातील साक्षीदार विजय पगारे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी क्रुझ ड्रग्जप्रकरणाच्या दोन दिवस आधी काय काय घडलं होतं, याचा आँखो देखा हालच पगारे यांनी सांगितला. शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आलं आहे. सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि किरण गोसावी आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केला आहे.
गेल्या पाच सहा महिन्यांपासून मी सुनील पाटील यांच्यासोबत आहे. ते माझं एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसे दिले होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होतो. त्यासाठी सतत त्यांच्यासोबत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेललाही थांबलो आणि अनेक हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत राहिलो. पण फॉर्च्युन हॉटेलमध्ये २७ सप्टेंबर रोजी वाशीमध्ये फॉर्च्युनमध्ये दोन रुम बूक होते. साधारण साडे सातच्या सुमारास भानुशाली आणि एक जाडी मुलगी त्या ठिकाणी आली होती. दुसऱ्या रुममध्ये मी, किरण गोसावी आणि सुनील पाटील असे तिघे जण होतो. भानुशाली त्याच्या रुममध्ये दोन तास थांबला. नंतर निघताना भानुशाली आमच्या रुममध्ये आला. यावेळी त्याने सुनील भाऊंची पप्पी घेतली. भाऊ बडा गेम हो गया. आपने को अभी के अभी अहमदाबाद निकलना है. नाना को नही लेना है. (मला नाना म्हणतात) मी म्हणालो, तुमचं काय असेल ते असेल. पण माझे पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. त्यावर तुम्ही चिंता करू नका तुम्हाला तुमचे पैसे मिळेल, असं भाऊ म्हणाले. आम्ही येईपर्यंत रुम सोडू नको म्हणून त्यांनी मला बजावलं होतं, असं पगारे म्हणाले.
त्यानंतर रात्री साडे अकरा बारा वाजता एमएच १२ इनोव्हा गाडी ३००० क्रमांकाच्या गाडीत ते बसले. गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप होती. या गाडीत केपी गोसावी, भानुशाली आणि सुनील भाऊ होते. ते अहमदाबादला जायला निघाले. २८ तारखेला मी संध्याकाळी सुनील भाऊंना फोन केला तर ते म्हणाले अहमदाबादला पोहोचलो नाही. गाडीचं काम निघालं. त्यामुळे पोहोचलो नाही. त्यानंतर मी २९ तारखेला फोन लावला. सुनील भाऊ म्हणाले, तू आराम कर तुझे पैसे मिळतील. त्यानंतर त्यांचे स्वत:हून फोन आले. तुझे पैसे मिळतील, एवढंच ते सांगत होते, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर एकदा सकाळी सात सव्वासातला मनिष भानुशाली माझ्या रुममध्ये आला, आपणा काम हो गया. तेरा पैसा मिल जायेगा. सुनील भाऊ अहमदाबाद गया है. आम्ही गाडीतून निघालो. त्यावेळी तो बडबड करत होता. इतने में डील हुआ था. इतनाही क्यों मिला? ५० लाख रुपये लेकर केपी गोसावी गायब तो नही हो गया? असं तो बडबडत होता. मला त्याचं काही समजत नव्हतं. तासभर आम्ही प्रवास करत होतो. त्यावेळी तो अनेकदा फोनवर बोलला. कधी सुनील भाऊशी तर कधी इतरांशी. मी हे सर्व ऐकत होतो. त्यावेळी नेमकं काय चाललं हे मला कळलं नाही. पण एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्यावर तिथे मीडिया होता. पोलीस होते. मी एकाला विचारलं तर शाहरुखच्या मुलाला अटक झाल्याचं मला कळलं. त्यावेळी माझी ट्यूब पेटली. भानुशाली याच प्रकरणाबाबत बोलत असल्याचं क्लिक झालं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
भानुशाली वाटेत कधी २५ तर कधी १८ कोटी म्हणत होता. साडे सहा कोटीचा हवाला झाला आहे. कधी तो पूजा, कधी सॅम डिसूजाचं नाव घेत होता. तर कधी मयूर हे नाव घेत होता. एनसीबीच्या कार्यालयापासून मी त्याला ठाण्याला सोडलं. तेव्हाही गेम फेल हो गया वगैरे तो बोलत होता. हे सर्वजण या प्रकरणात सामील होते, असं सांगतानाच आर्यन खानला या प्रकरणात शंभर टक्के अडकवण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दुसऱ्या दिवशी आर्यनला किल्ला कोर्टात आणलं तेव्ही मी किल्ला कोर्टात पोहोचलो. त्यावेळी मला प्रवेश मिळाला नाही. एका पोलिसाला विनंती केल्यानंतर मी आत गेलो. तिथे एका गाडीजवळ जाऊन ती गाडी कुणाची आहे याची चौकशी केली. तेव्हा ही गाडी अॅड. सतीश मानेशिंदे यांची असल्याचं कळलं. मानेशिंदेच्या ड्रायव्हरला मी या प्रकरणाची सत्यता सांगितली. पण आपण काहीच करू शकत नसल्याचं तो म्हणाला. त्यानंतर मी मानेशिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. दोन मिनिटं बोलायचं आहे असंही मानेशिंदेंना सांगितलं. पण ते नो नो नो… म्हणत गाडीत बसले. त्यानंतर मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.




