ईडीकडे सर्व पुरावे, अनिल देशमुखांची अटक अटळ : अॅड. जयश्री पाटील

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही अटक होईल, अशी प्रतिक्रिया देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात पडू नका म्हणून धमकी देखील देण्यात आली, असा दावा त्यांनी केलाय. पण तरीही आपण घाबरणार नसून लढा सुरु ठेवणार, असंही जयश्री पाटील यांनी सांगितलं.
मी ईडीच्या कारवाईवर समाधानी आहे. कारण सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे तो माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार दाखल केला आहे. ईडीने देखील माझ्या तक्रारीवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे. मी दिलेली सगळी माहिती आहे. मी दिलेल्या पीडित लोकांची माहिती आहे जे अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. कारण अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात, असं जयश्री पाटील म्हणाल्या.
उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरणाचा डीवीआर अजून सापडलेला नाही. अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना ईडीने अटक केलेली आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांनाही ईडीने बोलावलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनाही अटक होईल. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुख यांच्यावर कुणाचीही हात असला तरी त्यांना अटक होईल. माझ्याकडे बारमालकांनी पुरावे दिले होते, असंही जयश्री पाटील यांनी सांगितलं
अनिल देशमुख यांना ईडीने याआधी नोटीस बजावली होती. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. ईडीने अनिल देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवले आहेत. त्यानुसार अनिल देशमुख उद्या म्हणजेच मंगळवारी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचा आरोप केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे.




