‘रामायण’ मालिकेतील ‘रावण’ हरपला; अरविंद त्रिवेदी यांचे निधन

मुंबई : टीव्ही जगतातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारली होती.
ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ‘रामायण’मध्ये रावणाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम आणि वेताळ’मध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेदेखील गुजराती सिनेमांतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतून अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
अरविंद त्रिवेदी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. याच वर्षी मे महिन्यात त्यांच्या मृत्यूची अफवाही पसरली होती. तेव्हा कौस्तुभ यांनी पुढे येऊन, अरविंदजी यांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याचे सांगितले होते. तसेच, फेक न्यूज पसरवू नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
त्रिवेदी यांनी किमान ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. २००२ मध्ये त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनविण्यात आले होते. याशिवाय, ते १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदारही झाले होते.




