दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होणार?
शिक्षण विभागाची मंगळवारी महत्वाची बैठक; नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करणार?

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील हिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. आता मग नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष आहे. या संबंधी उद्या (मंगळवारी) शिक्षण विभागाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर दुपारी 12.30 वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णयाची घोषणा करतील.
या बैठकीत पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या जाऊ शकतात. जर दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या गेल्या तर विकएन्ड लॉकडाऊनच्या वेळी शनिवारी येणाऱ्या पेपरसाठी काय व्यवस्था करता येईल याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. उद्या शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षण विभागाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
या आधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, आपण कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपण ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत होतो. पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देणार आहोत.