म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, औषधांचा तुटवडा : टोपे

मुंबई: कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आपल्याला या इंजेक्शन्सचा मोठा साठा ३१ मे नंतर मिळणार आहे. त्यामुळे येणारे १० दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी गंभीर इशारा दिला. आजघडीला राज्यात म्युकरमायकोसिसचे ८५० रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे. सरकार त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, ही इंजेक्शन्स ३१ मे नंतरच उपलब्ध होऊ शकतील.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार असल्याचंही टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मदत दिली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.




