देशात कोरोनाचा कहर सुरूच! २४ तासात ३,५७,२२९ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : सोमवारी देशात ३ लाख ६८ हजार १४७ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३, ४१७ जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर गेल्या २४ तासात देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३,४४९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांचा एकूण आकडा वाढून २ कोटी २ लाख ८२ हजरांवर पोहोचला आहे तर एकूण २ लाख २२ हजार ४०८ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून दिवसेंदिवस बाधित रूग्णांचा आकडा वाढतांना दिसतोय, देशात सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. या काळात दिलासादायक बाब म्हणजे १ कोटी ६६ लाख १३ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १५ कोटी ८९ लाख ३२ हजार नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या दोन दिवसांच्या आकडेवारी वरून असे लक्षात येते की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव एकीकडे सुरू असला तरी दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. यासोबतच नव्या कोरोना बाधितरुग्णांच्या संख्येत देखील घट होताना दिसत आहे.




