नाट्य परिषदेच्या वादावर शरद पवार तोडगा काढणार

मुंबई : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नाट्यपरिषदेमध्ये वाद निर्माण झाले होते. प्रसाद कांबळी यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन नियमक मंडळातील एक एक सदस्य बंडखोरी करताना समोर आले होते. याची संख्या ही पूर्वी १० ते १५ जणांवर होती ती आता ती जवळपास ४७ ऐवढी झाली आहे. नियमक मंडळाचे एकून सदस्य बळ हे ६० आहे आणि त्यापैकी ४७ म्हणजेच बहुसंख्य सदस्य हे पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. यासंदर्भात प्रसाद कांबळी यांना वारंवार पत्रव्यवहार करुन बैठक घेण्याचे सुचवले होते. मात्र याकडे प्रसाद कांबळी यांनी दुर्लक्ष केले होते. म्हणून नियमक मंडळ सदस्यांनी १८ फेब्रुवारीला बैठक घेतली होती. या बैठकीत बहुमतांनी नरेश गडेकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती.
प्रसाद कांबळी यांनी या बैठकीच्या विरोधात ठराव मांडून यासंबंधी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. हे सर्व प्रकरण सुरु असताना आता नेमका अध्यक्ष कोण? याचा गोंधळ नाट्यपरिषदेत सुरु असताना यासर्व प्रकारात शरद पवारांची एन्ट्री झाली आहे. यांसंबंधीची महत्तवाची सूचना स्वत: परिषदेचे विश्र्वस्त अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर, शशी प्रभू, सतीश लोटके यांच्यासोबत भेट घेतली. पवारांनी सर्व गोष्टी ऐकल्यानंतर १८ फेब्रुवारीला जे ठरलंय त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार आता नवीन हंगामी अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे.
दुसऱ्या बाजूला आताचे विद्यमान अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना यासंबंधी विचारले असता, त्यांनी असे म्हटले की हा पत्रव्यवहार अंतर्गत असल्यामुळे तो असा बाहेर येणे योग्य नाही. तरी पण त्याबाजूने शरद पवार यांची भेट घेतली तशी आम्ही सुद्धा शरद पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगून आमची बाजू स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे आता दोन्ही बाजू स्पष्ट झाल्यानंतर याप्रकणातील तिढा आता लवकर सुटण्याची शक्यता आहे.




