
ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते जलमय झाले होते. परिणामी, लांबवरून आलेल्या प्रवाशांची कुचंबणा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वंदना सिनेमा येथे पाण्यात उतरून त्यांनी लोकांना मदत करण्याचे धोरण अंगीकारले होते. काही रिक्षा तैनात करून त्यांनी प्रवाशांना इच्छितस्थळी सोडले. रिक्षा उपलब्ध नसताना स्वतःच्या वाहनाने त्यांनी प्रवाशांना त्यांच्या घरी सोडले.

पावसाने शनिवारी आज सकाळपासून धुवाँधार बॅटींग सुरू केली. पावसाने शहराच्या अनेक भागात पाणी जमा झाले असल्याचे समजल्यानंतर मनोज प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील विविध भागांत दुचाकीवरून पाहणी केली. वंदना सिनेमा येथे लांब पल्ल्याच्या एसटी बस येत असतात. मात्र, याच ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने प्रवास करून आलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. ही बाब ध्यानात येताच प्रधान यांनी तत्काळ काही रिक्षा तैनात केल्या. तसेच, आपले स्वतःचे वाहन बोलावून त्याद्वारे नागरिकांना इच्छित स्थळी सोडले.
दरम्यान, यावेळी त्यांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले. एका ट्युबवर बसून तुंबलेल्या पाण्यात गाड्या नको , होड्या चालवा, असा संदेश दिला. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून वंदना सिनेमा परिसरात पाणी साचत आहे. त्यावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सत्ताधारी आणि प्रशासनाला करता आलेल्या नाहीत. आम्ही सहा जूनपासून नालेसफाईवरून ओरडत आहोत. मात्र, सत्ताधारीही त्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणूनच ठाणे शहर जलमय होत आहे. आता नागरिकांनीच लक्ष देऊन आपण कोणाला निवडून देतोय, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सांगितले. यावेळी मकसूद खान, विश्वास चव्हाण, प्रविण कडलाक, संदेश गमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




