दादरच्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी जाहीर कार्यक्रमास बंदी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. कारण ओमिक्रॉन हा विषाणू मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सामाजिक कार्यक्रम, जास्त गर्दी होण्याची शक्यता आलेल्या सभा, संमेलने, मोर्चा कार्यक्रमांवर निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे. यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त येत्या ६ डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य सरकारने बंदी आणली आहे. यासाठी राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.
मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्राम स्थळ आणि समाथी स्थळ आहे. दरवर्षी ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्माण दिन म्हणून साजरा केला जाते. यंदा हा ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर दाखल होत असतात. मात्र यंदा चैत्यभूमी परिसरात किंवा शिवाजी पार्कवर कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. असे राज्य सरकारने जाहीर केले आहेत.
राज्य सरकारची नवी नियमावली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा महापरिनिर्माण दिन खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने आणि लोकांनी एकत्रित न येता आयोजित करायचा आहे.
– महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथील आयोजित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुयायांनी घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.
– चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसलेल्या मान्यवरांना या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
– महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात खाद्यपदार्थ, पुस्तक असे कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाहीत.
– या परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढण्यास परवानगी नाही.
– कार्यक्रमाच्या ठिकाणी अनुयायांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागणार आहे.




