भवानीपूर : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तृणमूल-भाजप कार्यकर्ते भिडले
दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप; सुरक्षा रक्षकांनी काढले पिस्तूल

भवानीपूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जर मुख्यमंत्री पद टिकवायचे असेल तर भवानीपूरहून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखलेल्या ममतांना पुन्हा हरवण्यासाठी भाजपाने मोठी ताकद भवानीपूर मतदारसंघात झोकली होती. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर हल्ला झाला आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पिस्तूल काढावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. भाजपा खासदारासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल एवढी घाबरलीय कशाला? नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा राग तृणमूल इथे काढत आहे.
दिलीप घोष यांनी म्हटले की, लढाई मोठी आहे. तृणमूल घाबरलीय. यामुळे ते आता मारहाणीवर आले आहेत. भाजपा खासदार अर्जुन सिंह प्रचार करत होते. तेव्हा तृणमूलचे काही लोक त्यांच्या मागे लागले. गो बॅकचे नारे देत होते. त्यांना धक्काबुक्की करून त्या भागातून जाण्यास भाग पाडले.




