
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष काही संपणार नसल्याचं दिसतंय. नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेला इशारा दिल्यानंतर आज शिवसेनेने ‘सामना’तून राणेंविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता नारायण राणे यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. काही जुने व्हायरस परत आले आहेत, त्यांचाही बंदोबस्त करायचाय, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
अजूनही थोडे दिवस थांबायला पाहिजे, कोरोनाचं संकट खरंच गेलं आहे का? पूर्ण गेलेलं नाही, अजूनही आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आले आहेत. ते पण दिसतंय…आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आह, त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर निशाणा साधला. सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं इथून तिथे आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती. त्यावेळी एक शब्द वापरला होता ‘रिवेंज टुरीझम’. त्यांचं असं म्हणणं होतं की जरा सावधनता बाळगा, पर्यटन स्थळावर एवढी गर्दी होत आहे की पुन्हा हे संकट येऊ शकतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.




