मोदी सरकारकडून राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी ईडी, सीबीआयचा वापर : राजू शेट्टी

मुंबई : मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा मोदी सरकारच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. ४३ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपवर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्रकुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर बदनामीचा आरोप केलाय. त्यानंतर राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे ५ वर्षे फेऱ्या मारल्या. ४३ कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो. ईडी एकप्रकारे राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. ५ वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. मात्र, आता ही कारवाई करण्यात आली! याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे.




