हाच तो लिपस्टिक दौरा; नितेश राणेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका
That's the lipstick tour; Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray again

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानं नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी चिवला समुद्र किनारा आणि मालवणच्या नुकसानाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हा दौरा केवळ फोटोसेशनसाठी असेल, असं नितेश राणे म्हणाले होते. आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही त्यांनी ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, असा टोला हाणला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या एकदिवसीय पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नितेश राणे यांनी ट्वीट केलंय. ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून १० किमीच्या आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला!!! इथे.. फडणवीसजीं चा ७०० किमी चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!’, अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
यालाच म्हणतात “lipstick” दौरा..
मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..
मोजून 10 km आतच..
विमानतळावरचा आढावा..
दौरा संपला!!!
ईथे..
फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 21, 2021
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ देखावा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असंही राणे म्हणाले होते.
मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही : उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. ते आज कोकणाच्या पाहणी दौऱ्यावर होते. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.




