![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/07/narendra-singh-tomar.jpg)
नवी दिल्ली: गेल्या आठवड्याभरात राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला. बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. या सगळ्याची दखल घेत मोदी सरकारनं राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अधिवेशनात विरोधकांनी पेगॅसस प्रोजेक्ट अहवालावरून जोरदार घोषणाबाजी केली. आजही लोकसभेत प्रचंड गदारोळ सुरू होता. याच अधिवेशनात कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. केंद्रानं राज्याला ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पूर आला. त्यामुळे घरांचं, शेतीचं खूप नुकसान झालं. चिपळूण शहर कित्येक तास पाण्याखाली होतं. रायगडच्या तळीये दरड कोसळून खूप मोठी जीवितहानी झाली. सांगलीतही दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. या पावसानं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं.