अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून ३६५ कोटी मंजूर

मुंबई : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं होते. अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झालं होते. राज्य सरकारकडून तत्काळ मदत जाहीर करण्यात आली होती तर आता राज्य मंत्रिमंडळाने ३६५ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करताना विभागानुसार निधी मंजूर केला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात अधिक नुकसान झालं होते. अतिवृष्टीबाधित भागाची पाहणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री यांनी चिपळूणची पाहणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुरबाधित भागाची पाहणी केली होती. अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे.
राज्य सरकारने विभागानुसार कोकण विभागास एकूण ८ कोटी ५१ लाख एकूण तर नाशिक विभागाला १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागाला ७७ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर विभागास १० कोटी ६५ लाख रुपये तर पुण्याला १५० कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पुणे विभागाला अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सराकारने दिलेला निधी हा विभागातील आयुक्तांमार्फत जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.




