
डोंबिवली : मुंबईतील निर्भया प्रकरणानंतर आता ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर २९ मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही १५ वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी २०२१ ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी १५ वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. महिला सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कृत्य करताना आरोपींनी व्हिडीओ शूट केलं होतं आणि या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीला ते वारंवार ब्लॅकमेल करत होते. त्यानंतर आरोपींनी तिला डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपींना आमच्या ताब्यात द्या : विद्या चव्हाण
डोंबिवली सामूहिक बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांची धिंड काढू अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेनंतर विद्या चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपींना आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.
आरोपींना जरब बसेल असे काहीतरी करा : फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, डोंबिवलीच्या भोपरमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.




