कोरोना काळात जगभरातील १५ लाख मुले अनाथ; ‘द लँसेट’चा निष्कर्ष

वॉशिंग्टन : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या महामारीने आतापर्यंत लाखो लोकांचा जीव घेतला आहे आणि लाखो मुलं या काळात अनाथही झाली आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगभरातील तब्बल १५ लाख बालकांनी आपले आई-वडील अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले आहे. द लँसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अहवालात हे समोर आले आहे.
यापैकी १ लाख ९० हजार बालकं एकट्या भारतातील आहेत. ज्यांनी कोरोना काळात आपले आई, वडील, आजी, आजोबा यांपैकी कुणाला ना कुणाला गमावले आहे. यात सांगण्यात आले आहे, की कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या १४ महिन्यांत १० लाखाहून अधिक बालकांनी आपले आई-वडील दोघेही अथवा यांपैकी कुण्या एकाला गमावले. तर इतरांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या आजी-आजोबांना गमावले आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च २००० ते एप्रिल २०२१ दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण ८.५ पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या ५,०९१ वरून ४३,१३९ वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ज्या मुलांनी आई वडील अथवा आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर खोलवर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. त्यांनी, आजार, शारीरिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि किशोरवयीन गर्भधारणेच्या जोखमेबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन कोविड-१९ रिस्पांस टीमचे मुख्य लेखक डॉ. सुसान हिलिस यांनी म्हटले आहे, की गेल्या ३० एप्रिल, २०२१ पर्यंत कोरोनामुळे जगभरात ३० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे १५ मुले अनाथ झाली आहेत, असे आमच्या संशोधनात समोर आले आहे.




