‘त्या’च शब्दाच्या वापरावरून योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का? नवाब मलिकांचा सवाल

मुंबई : संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांना खुर्ची देतानाच्या राऊतांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत करतात. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राऊतांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक उतरले आहेत. त्यांनी याच शब्दाच्या वापरावरुन योगी आदित्यनाथांवरही गुन्हा दाखल होणार का? असा सवाल केलाय.
योगी आदित्यनाथ यांनीही त्या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर भाजप कधी गुन्हा दाखल करणार हा प्रश्न आहे. माझं आवाहन आहे की ज्या पत्रकाराला त्यांनी शब्द वापरला त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
जिस भाषा को लेकर संजय राऊत जी पर एफआयआर दर्ज हुआ उस भाषा के प्रयोग पर योगी जी पे एफआयआर कब दर्ज होगा|#एक देश दो कानून pic.twitter.com/MFtYguyrkT
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 13, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणसीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी मोदींवरही टीका केलीय. मोदी हे पंतप्रधान आहेत. वाराणसी हे त्यांचं निवडणुकीचं क्षेत्र आहे. प्रश्न असा आहे की साडे सात वर्षे झाली आहेत. त्यावेळी बोलले होते की गंगाने बुलाया है. मात्र अजूनपर्यंत गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. काशीच्या बाबतीतही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणीही काहीच झालं नाही. पावसाळ्यात संपूर्ण काशीमध्ये गुडघाभर पाणी भरतं. ज्या ठिकाणी ते निवडणूक लढवतील ती जागा आणि त्याच्या आजूबाजूच्या ४ जागा निवडून येणार नाहीत, अशा शब्दात मलिक यांनी मोदींवर टीका केलीय.




