पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान

कोलकाता : देशातील वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज (शनिवारी) पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यात नागरिकांच्या भरघोस प्रतिसादामुळे ७८.३६ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालच्या २९४ जागांपैंकी एकूण १३५ जागांवर चार टप्प्यात मतदान याअगोदर पार पडलंय तर अजून १५९ जागांवर मतदान बाकी आहे.
मतदानाच्या चौथ्या टप्प्यात सितलकुची भागात झालेल्या गोळीबारानंतर निवडणूक आयोगानं पाचव्या टप्प्यात सुरक्षा आणखीन वाढवली होती. या टप्प्यात केंद्रीय सुरक्षादलाच्या ८५३ तुकड्या तैनात करण्यात आल्या. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसेचा प्रकार घडल्याचं दिसून येतंय.
पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. बिधाननगरच्या शांतिनगर भागात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांत झटापट झाल्याचं समोर येतंय. एकमेकांवर दगडांनी केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.




