Top Newsराजकारण

आम्ही प्रश्न विचारतच राहू, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?; आशिष शेलारांचा पलटवार

मुंबई: प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर पलटवार केला आहे. गिरणी कामगारांपासून कोस्टल रोडपर्यंत मुंबईकरांना रोज प्रश्न पडत राहतात. आम्ही ते विचारत राहू. कारण प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार करत टोला लगावला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? ११४ टक्के नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,असा सवाल शेलार यांनी केला आहे.

मुंबईत गेल्या ११ वर्षात ४० हजार झाडांची बिल्डरांसाठी कत्तल केली, मग मुंबईकरांची मेट्रो कारशेडच का अडवून ठेवली? कोस्टलरोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग कसा? मुंबईतील आरक्षणे बदलून भूखंडांचे श्रीखंड कुणी खाल्ले? मुंबईतील गिरणी कामगार कुठे गेले? असे बरेच प्रश्न मुंबईकरांना रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू! कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही?, असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पालिकेच्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका केली होती. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? स्वत: काही करायचं नाही अन् प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button