पंतप्रधान मोदींवरील टीकेनंतर चिदंबरम यांची चुकीची कबुली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०२१ नंतर १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांना जबाबदार धरल्याबाबत केंद्रावर टीका होताना पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रावर सरकारवर टीका केली होती.
पंतप्रधान मोदी राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कुणीही म्हटलेले नाही, असे पी. चिदंबरम यांनी टीका करताना म्हटले होते. मात्र, सोशल मीडियावरील एक युझरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचे पत्र पोस्ट केले. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती, याची माहिती एएनआयकडे विचारली होती. माझी चूक झाली. मी माझी भूमिका दुरुस्ती केली आहे, अशी कबुली देत पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आपल्या चुकांमधून शिकले आहे, हाच या घोषणेचा अर्थ होतो. त्यांनी दोन चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःच्या चुकांसाठी विरोधकांना दोषी ठरवले. केंद्राने लस खरेदी करू नये असे कुणीही म्हटले नव्हते. आता राज्यांवर आरोप करत, राज्यांना थेट लस खरेदी करायची होती. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली, असे पी. चिदंबरम टीका करताना म्हणाले होते.




