देशात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूच्या संख्येचा उच्चांक

नवी दिल्ली : देशात अजूनही कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन दिवसात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसली तरी मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत मृत्यूचा संख्येत विक्रमी वाढत झाली आहे. तर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्यपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४८ हजार ४२१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार २०५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ५५ हजार ३३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ५४ हजार १९७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ३७ लाख ४ हजार ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ जणांचे लसीकरण पार पडले आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३० कोटी ७५ लाख ८३ हजार ९९१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी १९ लाख ८३ हजार ८०४ नमुन्यांच्या चाचण्या काल दिवसभरात झाल्या आहेत.




