
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे कोरोनाबाधित झालेल्या हजारो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यान, कोरोना बळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती. त्यावर केंद्राने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे.
कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबास नुकसान भरपाई मिळावी, पण ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाईची किती रक्कम देण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाने ६ आठवड्यांच्या आत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले. कोरोना मृत्यूंच्या नुकसान भरपाईसाठी याचिकेत ४ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देता येणार असे सांगणारी केंद्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली नाही, परंतु ही रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्चित केली जाईल असे सांगितले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ४ लाख रुपये देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली नाही.
एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी कोरोनाबळींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासाठी वापरण्यात आला, तर कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी, विविध अत्यावश्यक औषधी आणि पुरवठा साहित्यासाठी किंवा चक्रीवादळं आणि पूर परिस्थितीबद्दल मदत करण्यासंदर्भात राज्यांकडे पैसाच राहणार नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेपलीकडची आहे, असे केंद्रानं सुप्रीम कोर्टात भूमिका मांडताना म्हटले होते.




