राज्यातील कोरोनाची स्थिती भयावह

मुंबई : राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. राज्यात एकाच दिवशी तब्बल 25,833 रुग्णांचा नोंद झाली आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 12,174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 1 लाख 66 हजार 353 वर पोहचली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक 2877 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या 7 ऑक्टोबरला ही संख्या 2848 होती. रुग्णसंख्येने रेकॉर्डब्रेक केल्याने राज्याची तसेच मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईत अनलॉक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र कोरोनाचा धोका कमी कायम असल्याने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यानंतर दिवसेंदिवस आकडेवारी वाढते आहे. बुधवारी (17 मार्च) 2377 रुग्णांची नोंद झाली होती. आज दुसऱ्याच दिवशी ही संख्या तब्बल 500 रुग्णांनी वाढून 2877 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात 1193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 लाख 52 हजार 835 रुग्ण आढळले असून 3 लाख 21 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 11 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 18 हजार 424 सक्रीय रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राज्यात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण
राज्यात गुरुवारी तब्बल 25,833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेडचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.