राजकारण

कर्ज काढा, पण तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मदत करावी; नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला आहे. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. मिरकरवाडा बंदरात नाना पटोले यांनी आढावा घेतला यावेळी त्यांनी राज्य सरकारने गरज वाटल्यास कर्ज घ्यावे पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही केली तरी राज्य सरकारने कोकणातील जनतेला मदत करावी अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी जिल्ह्यातील तौक्ते चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मिरकरवाडा बंदरातील नुकसानीची पाहणी केली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील लोकांना भरीव मदत करुन पुन्हा उभ केले पाहिजे. वेळ आली तर कर्ज घ्या केंद्राने मदत केली नाही तरी महाराष्ट्र सरकारने कोकणावासियांना पुर्ण मदत, भरीव मदत करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारकडे भीक नाही मागत आहे तो आमचा हक्क आहे. राज्य सरकारला गरज पडल्यास कर्ज घ्या पण या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना भरीव मदत करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाना पटोलेंनी केले आहे.

कोरोना संकटात राजकारण करण्याची वेळ नाही परंतु भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. नुकसानग्रस्तांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारकडून मदत आली पाहिजे हा आमचा अधिकार आहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत महाराष्ट्रातून ४० टक्के हिस्सा जातो त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावे असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. तर गुजरातला १ हजार कोटी दिले असून महाराष्ट्रालाही २ हजार कोटीची मदत करतील असे वाटले होते परंतु पंतप्रधानांनी अजूनही मदत केली नाही यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे आहेत का? असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button