राज्यात कोरोना बळींच्या संख्येत मोठी घट

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधित मृतांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. रविवारी राज्यात ४०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. परंतु, सोमवारी हा आकडा कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. सोमवारी राज्यात १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९५ हजार ३४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट झालेली पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत १५ हजार ७७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले.
कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होत असतानाच राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेसुद्धा होत आहेत. सोमवारी राज्यात ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९५,३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.८८ टक्के एवढे झाले आहे.
सोमवारी राज्यात १५ हजार ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ४६ हजार ८९२ वर पोहोचली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ५३ हजार ३६७ झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५०,५५,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,४६,८९२ (१६.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,७०,३०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १०,७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.




