महिलांनी उपचारासाठी क्वारंटाईन सेंटरवर जायचे की घरीच मरायचे? : चित्रा वाघ

मुंबई : अंधेरी येथे एका हॉटेलमध्ये उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. या महिलेची छेड तेथील आरोग्य सेवक सरफराज मोहम्मद खान काढली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेची छेड काढल्याच्या प्रकरणावरुन भाजप प्रदेशा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. महिला ॲडमिट झाल्यावर डिस्चार्ज होईपर्यंत जबाबदारी कुणाची? आता महिलांनी उपचारासाठी क्वारंटाईन सेंटरवर जायचे की घरीच मरायचे? याचं उत्तर सरकारने द्यावं असा प्रश्न चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.
पनवेलमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबईतील एका हॉटेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाली होती. क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन महिला घरी परतण्याचा वेळी या महिलेसोबत आरोग्यसेवक सरफराज मोहम्मद खान याने छेडछाड केली. असा आरोप या महिलेने केला आहे. महिलेने केलेल्या आरोपाच्या आधारावर अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आरोग्यसेवकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे मुंबईसह राज्यात शक्य असेल तिथे तसेच हॉटेलमध्ये क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. अंधेरीतील अशाच एका क्वारांटाईन हॉटेलमध्ये तिथल्याच आरोग्यसेवकाने कोरोनाग्रस्त महिलेची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं की घरीच मरावं याचे उत्तर आता सरकारनेच द्यावं असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. संबंधित आरोपीवर कारवाई व्हावीच पण ज्या प्रशासनअधिकार्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला त्यालाही यात सहआरोपी करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
राज्यात मागील काळातही काही कोविड सेंटर्सवर १४ विनयभंग आणि ४ बलात्कार झाले आहेत. याबाबत कुठल्या आणि किती अधिकाऱ्यांवर सरकारने कारावाई केली? जर एखादी महिला उपचारासाठी दाखल झाल्यावर डिस्चार्ज होईपर्यंत जबाबदारी कुणाची? असाही सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.




