
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.
संजय राऊत यांनी हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊतांनी एकदा तर २५ वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केलीय. तसंच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विचारलं असता राज्यानं त्यांचे कर कमी करावेत. जेणेकरुन त्यांचे दर कमी येतील, असं राणे म्हणाले. हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. त्यासाठी एक महिना, दोन महिने असा वेळ मी देणार नसल्याचं राणे म्हणाले. मुंबई महापालिकेबाबत मला कुठलिही जबाबदारी देण्यात आलेली नाही, असंही राणेंनी स्पष्ट केलंय.




