शिवसेनेच्या जीवावर राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत घ्या !
भाजप नेते अतुल भातखळकर यांचा पलटवार

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर निर्माणात कथित जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, राम मंदिर निर्माणात काही घोटाळा झाला असेल, तर त्यात स्वतः पंतप्रधान मोदी, मोहन भागवत यांनी लक्ष घालायला हवे. यानंतर, भाजपनेही शिवसेनेवर जबरदस्त पलटवार केला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, ते राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टसंदर्भात सातत्याने आरोप करत आहेत. देशातील कोट्यवधी राम भक्तांच्या आस्थेला धक्का देणारे आहेत.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भातखळकर यांनी म्हटले आहे, लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही.
शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’त मंगळवारी म्हटले आहे, की राम मंदिर कामाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे व्हायरल हवी. कारण ती एक राष्ट्रीय गौरवाची गोष्ट आहे. अग्रलेखातून थेट पंतप्रधानांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यात अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल, असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राम मंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.




