Top Newsराजकारण

नवीन मंत्र्यांसाठी पंतप्रधान मोदींनी आखून दिल्या लक्ष्मण रेषा

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी शपथविधीपूर्वी झालेल्या एका बैठकीत त्यांच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहे, कोणते संकल्प डोळ्यासमोर असायला हवेत, याबाबत चर्चा करत तीन महत्त्वाच्या लक्ष्मण रेषा आखून दिल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदींनी नवीन मंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत, यासह कोणत्या गोष्टी अजिबात करू नये, यावरही भर दिला आहे. आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने पार पाडाव्यात, अशी सूचना मोदींनी केली आहे. यासह पंतप्रधान मोदींनी नवीन मंत्र्यांसाठी तीन लक्ष्मण रेषा आखून दिल्या आहेत.

भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात ना खाणार, ना खाऊ देणार, असा नारा दिला होता. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचारमुक्त शासनाची ग्वाही दिली होती. याचाच एक भाग म्हणून काही झाले, तरी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचारावर झीरो टॉलरन्सची पॉलिसी आहे, असे स्पष्टपणे सांगितल्याचे समजते.

जबाबदाऱ्या ओळखून ध्येयापर्यंत पोहोचावे

पंतप्रधान मोदींनी केवळ योजना, धोरणांच्या घोषणा होतात. मात्र, त्या सत्यात उतरत नाहीत, असा दावा आधीच्या सरकारवर केला होता. या पार्श्वभूमीवर नवीन मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून नियोजित ध्येयापर्यंत पोहोचावे, असे स्पष्ट केले आहे. तसेच काही १५ ऑगस्टपर्यंत नवीन मंत्र्यांनी दिल्लीतच राहावे. आपापल्या मंत्रालयाचे काम समजून घ्यावे, शिकून घ्यावे, असेही मोदींनी सांगितल्याचे समजते.

जल्लोष करू नये, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे

पंतप्रधान कार्यालयाकडून नवीन मंत्र्यांना अनेक गाइडलाइन्स देण्यात आल्या आहेत. तसेच आताची देशातील परिस्थिती पाहता कोणीही जल्लोष साजरा करू नये, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सांगितल्याची माहिती मिळाली आहे. अलीकडेच ५ राज्यांच्या विधानसभान निवडणुकांमध्ये केंद्राने कोरोना नियमांच्या पालनाकडे लक्ष न दिल्याचा आरोप करण्यात आला होता. देशातील न्यायालयांनीही याबाबत मोदी सरकारची कानउघडणी केली होती. तसेच याशिवाय मीडिया लाइमलाइटपासून दूर राहावे. मीडियाशी संपर्क ठेवताना मर्यादा असाव्यात. उटसूठ मीडियासमोर वक्तव्ये करू नयेत, असेही पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button