Top Newsराजकारण

पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत तब्बल ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक !

गेल्या ७५ वर्षांत झाले नाही, ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून घोटाळे, फसवणूक यासंदर्भात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरित्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, गेल्या ७५ वर्षांत असे झाले नाही, अशी टीका केली आहे.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपन्यांच्या अनेकविध ठिकाणच्या कार्यालयांवर सीबीआयने छापेमारी केली. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने तक्रार दाखल केली होती. आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतीय जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजे बांधणे आणि दुरुस्तीच्या व्यवसायात आहे. या कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेजची जहाजे बांधण्याची क्षमता आहे. तर, एबीजी शिपयार्डशी संबंधित मुंबईतील काही ठिकाणीही सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

भाजप राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला दाखल करणार !

भारताचे ‘गुजरात ते बंगाल’ असे वर्णन केल्याप्रकरणी राहुल गांधी अडचणीत आले आहेत. राहुल यांच्या एका ट्विटमुळे असाम भाजप राहुल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या ट्विटसाठी भाजपकडून 14 फेब्रुवारीला आसाममध्ये किमान एक हजार देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

रविवारी असामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला होता. हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाषा १९४७ पूर्वी जीनांच्या भाषेसारखीच आहे, असे विधान केले होते. आसामचे मुख्यमंत्री इथेच न थांबता राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलं असल्याचं म्हटलं होतं.

राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही काँग्रेस नेत्यासाठी भारत पश्चिम बंगालमध्ये संपतो, असे म्हटले होते. माझा अरुणाचल प्रदेश भारताचा ईशान्य भाग आहे, हे त्यांना दिसत नाही, असे ते म्हणाले होते. आता राहुल गांधींच्या ट्विटवर भाजप त्यांच्यावर आसाममध्ये देशद्रोहाचा खटला दाखल करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button